श्रीगोंदा, दि.११ प्रतिनिधी
shrigonda adhava baithak शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे. कामात पारदर्शकता, गती व गुणवत्ता हवी. जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने अधिक लोकाभिमुख व जबाबदारीने काम करावे.तालुक्यातील विकास कामा करीता वनजमीनीचा उपयोग करून घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
श्रीगोंदा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा सखोल आढावा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माऊली संपर्क कार्यालय, श्रीगोंदा येथे घेतला. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, श्रीगोंदा येथे वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीचा विनियोग विविध विकास कामांसाठी व्हावा, यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून पाठविण्यात यावा.
प्रत्येक विकास कामासाठी वन विभागाचे ना हरकत दाखले लागणार असतील तर प्रश्न सुटणार नाहीत.संगमनेर तालुक्यात लेपर्ड रेस्क्यू सेंटर तयार करण्यात येत आहे त्याच धर्तीवर श्रीगोंदा येथे सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. तालुक्यात अधिक चांगली पोलिसिंग व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यकते नुसार नवीन पोलीस स्टेशन, पोलिसांसाठी निवास व्यवस्थेसाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणार्या कुकडी कालव्याच्या कामांना वन विभागाने परवानगी द्यावी पुर्वीपासून कालवे तुमच्या जागेतून गेले आहेत.सौर उर्जा प्रकल्पाची काम करणार्या कंपन्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव सांगून विभागाच्या कालव्यावरून लाईन टाकण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत.
ते पुढे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक बेघराला त्याच्या हक्काचे स्वतःचे घर मिळावे यादृष्टीने घरकुल योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. आजघडीला विजेचा वापर, निर्मिती व भविष्यातील मागणी लक्ष्यात घेता विजेचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सोलर योजनेवर अधिक भर देण्यात यावा.मागेल त्या शेतकऱ्यांना सोलरपंप देण्याबरोबरच विविध शासकीय योजना राबविताना सोलर योजनेला प्राधान्य देण्यात यावे. शहरामध्ये आबालवृद्ध व महिलांसाठी सर्व सोईनियुक्त उद्यान उभारण्यात यावे. त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार मुबलक प्रमाणात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खते व बि-बियाणे उपलब्ध व्हावीत. खते व बि-बियाण्यांमध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांना आरोग्याच्या सेवाही अधिक चांगल्या मिळाव्यात. सर्व प्राथमिक केंद्रात औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. केंद्रात महिलांच्या प्रसूतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देतानाच,अनेक विभागांच्या कार्यालयाना स्वताची जागा नाही कृषी वन विभागांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आ.पाचपुतेच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी महसूल, कृषी, अन्नधान्य पुरवठा, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण, घरकुल, रस्ते, वीज, सिंचन, अतिवृष्टी अनुदान, जलसंधारण, परिवहन यासह इतर विकास योजनांचा सविस्तर आढावा घेतला.