ahmednagar muncipal commissioner acb trap येथील महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर आठ लाख रुपयांची लाच मागितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील बांधकाम व्यवसायिक यांनी जालना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयुक्त जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत 8 लाख रुपये मागितल्याचे पंचासमक्ष खात्री पटल्यावर त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँटी करप्शन ब्युरो ,जालना यांनी अहमदनगर येथील महापालिकेच्या कार्यालयात येऊन पंचासमक्ष तक्रारदार यांना नवीन इमारतीच्या बांधकामासाठी लाच मागितल्याची खात्री केली.
तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4k रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि. 18.03.2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला. सदर परवानगी साठी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे हे त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांच्या मार्फत 9,30,000/-रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना डॉ. जावळे आयुक्त आणि त्यांचे स्विय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दिनांक 19.06.2024 रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे तक्रारी वरून आरोपी लोकसेवक यांची लाच मागणी पडताळणी दिनांक 19.06.2024, 20.06.2024 रोजी केली असता
आलोसे क्र. 2 देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8,00,000/- रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली.लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे आलोसे क्र.2 यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना सहाय्यक सापळा अधिकारी- शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो ,जालना यांनी यशस्वी केला.या पथकात पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर.सहभागी होते .